Tuesday, November 1, 2022

माझी पहिली रोड ट्रिप - केरळ

        हल्लीच आम्ही दिवाळीच्या सुट्टीत केरळची रोडट्रिप केली. त्याबद्दलचे अनुभव लिहावेत असं मनात होत म्हणून हि प्रवास वर्णनाची मालिका काढतेय. आशा आहे तुम्हा सगळ्यांना हा नवीन प्रयोग आवडेल.
        आम्ही सध्या बंगळुरूला राहतो.  इथून कोची जवळपास ५६०किमीवर आहे. हि आमची पहिली रोडट्रीप असल्या कारणाने आम्हाला जास्त थकवायचं नव्हतं स्वतःला म्हणून दिवसाला फक्त २५० किमी पूर्ण करायचं असं ठरवलं. 

        केरळला निसर्गाची भरपूर देणं आहे म्हणजे डोंगर, कडे-कपार्या, धबधबे, तळी, जंगले, समुद्र किनारा आणि बरच काही. त्यामुळे आम्ही ह्या ट्रिप साठी खूप उत्साहित होतो. एक आठवडा आधीच आमची बऱ्यापैकी सगळी तयारी झालेली. बाईक वरून रोडट्रीप असल्या कारणाने सेफ्टीबाबतची ची तयारी, हॉटेलचे बुकिंग, आणि कोणता रूट  घ्यायचा हे सगळं ठरवलं आणि आम्हाला कोणकोणत्या आव्हानांना सामोर जावं लागलं ह्या सगळ्या बद्दल ह्या पोस्ट मध्ये मी लिहिणार आहे. ह्या सगळयाचा सारांश मी प्रश्न उत्तराच्या माध्यमाने मांडते. 

        

प्रश्न १:  कोणता route घ्यायचा ?

उत्तरं : खूप सगळे यूट्यूब व्हिडीओ आणि ब्लॉग्स वाचल्यावर आम्ही हा route घ्यायचा ठरवलं. 

प्रश्न २ : किती दिवसांची प्रवास होता ?

उत्तर : १० दिवस 


प्रश्न ३: हॉटेल बुकिंग कशी केली आणि कुठे थांबायचं ?

उत्तरं : आम्ही कोणकोणत्या जागा बघायच्या हे ठरवलं होत पण जेव्हा आम्ही प्रत्यक्षात प्रवासाला सुरुवात करू तेव्हा गोष्टी बदलु  शकत होत्या म्हणून आम्ही agoda हॉटेल बुकिंग वेबसाईटची निवड केली. ह्यात फायदा असा होतो कि तुम्ही २ किंवा ३ महिने आधीपासून बुकिंग करून ठेऊ शकता त्यासाठी पैसे नाही द्यावे लागत आणि २४ तास आधीपर्यंत कॅन्सल केलं तर मोफत बुकिंग कॅन्सल करू शकतो. हि आमची पहिली रोडट्रिप असल्या कारणाने आम्हाला माहित नव्हतं कि आम्ही पूर्ण करू शकू कि नाही म्हणून मग agoda चा पर्याय चांगला होता. 


प्रश्न ४: सामानाचे काय ?

उत्तरं : हा सगळ्यात मोठा प्रश्न होता कारण आम्ही जेवढे पर्याय ऑनलाइन पहिले त्यात जास्त करून लोकांनी एकटयाने प्रवास केलेला त्यामुळे ते लोक मागची सीट सामान बांधायला वापरतात. पण आमच्या बाबतीत तसं करता येणार नव्हत. शेवटी २ पर्याय निवडले कॅरीयर लावणं किंवा सॅडल स्टँड. आम्ही JC रोडला गेलो आणि सगळे पर्याय पहिले आणि कॅरीयर लावायचा निर्णय घेतला. जो पुढे जाऊन चुकला. खरंतर आम्हाला सॅडल बॅग्सचा पर्याय निवडायला हवा होता कारण ते कॅरीयर फार स्ट्रॉंग नव्हतं ज्यामुळे कोचीला पोहचल्यावर आम्हाला टॅंक बॅग पण विकत घ्यावी लागली जेणेकरून मागचं वजन कमी होईल. 


प्रश्न ५ : सेफ्टीबद्दल काय ?

उत्तरं : बाईक वरून प्रवास करणार असल्याने सुरक्षेचा विचार करायलाच लागणार होता. आंम्ही दोघांनी पण रायडिंग जॅकेट्स घेतले आणि knee guards सुद्धा. विक्रांतने नवीन हेल्मेट सुद्धा घेतला. कारण सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणा करून चालणार नव्हतं. 






Saturday, July 18, 2020

लॉकडाउन आणि सवयी

नमस्कार मित्रांनो,

           लॉकडाउन अजूनही सुरूच आहे. सुरुवातीला वेळ होता तसा आता मिळत नाही कारण सुरुवातीच्या काळात सगळेच गोंधळले होते आणि निर्णय कि पुढे काम कस सुरु ठेवायचं त्याबद्दल काही ठरलं नव्हतं त्यामुळे बराच वेळ मिळायचा. पण आत्ता तसं नाहीयेय मित्रांनो. आता मिटिंग्स वैगरे सगळं ऑनलाईन चालतं तर मग आता कामाचा लोड वाढलाय.
        ह्या लेखात मी ह्या लॉकडाउन मध्ये काय शिकले याबद्दल आहे. खूप सगळ्या वाईट सवयीना बदलण्याची हि चांगली संधी होती. मी ह्या संधीचा पूर्ण फायदा घेतला असं नाही म्हणणार कारण अजून बराच काही होऊ शकल असतं. असो तर लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात मी बरीच पुस्तकं वाचली. काही पुस्तकांची नाव मी इथे सांगतेय :
1.Anything you want - Derek Sivers
2.Time management - Sudhir dixit
3.Eat that frog - Brian Tracy
4.The Blue Umbrella - Ruskin Bond
5.Faster than Lightening:My autobiography - Usain Bolt
6.Miracles of your mind - Dr. Joseph Murphy
7.Harry Potter and Prisoner of Azkaban - J.K.Rowling
8.The monk who sold his ferrari - Robin Sharma
9.The Diary of a Young Girl - Anne Frank
10.Brida - Paulo Coelho
11.मुसाफिर - अच्युत गोडबोले
12.How to win friends and influence people - Dale Carnegie
13.The Little Prince - Antoine de saint-Exupery
14.Siddhartha - Hermann Hesse,Hilda Rosner
15.Fault in our stars - John Green

           हे झालं पुस्तकांबद्दल पण अजूनही बऱ्याच गोष्टी या लॉकडाउनमध्ये शिकता आल्या. मला खूप दिवसांपासून व्यायामाची सवय लावायची होती पण कधीच तसा वेळ मिळत नाही अशी मी तक्रार करायची त्या तक्रारीचा बहाणा संपला आणि शेवटी मी दररोज व्यायाम करायची सवय लावून घेतली. माझं वजन कमी झालं कि नाही माहित नाही पण मला खूप छान वाटतं.
         तर मी सकाळची सुरुवात अशी करते :
        १.कोमट पाण्यात काही तूप घालून ते पाणी पिणे . मला मुळव्याधी चा त्रास आहे आणि ह्या रोजच्या एका सवयीने खूप आराम पडला. तसंच माझे पाय खूप वळायचे त्यावरही खूपच रामबाण औषध मिळालं. माझ्या आईने हा नुस्का स्वागत तोडकर सरांच्या युट्यूब वरच्या एका विडिओमध्ये पाहिलेला. थोडक्यात काय तर हि एक नवीन सवय माझ्या फारच फायद्याची ठरली.
        २. त्यानंतर अर्धा तास योगा आणि नंतर १५ मिनिटं ध्यान लावून बसणं. ध्यान केल्याने तुम्हाला लक्ष केंद्रित करायला बरीच मदत होते. आणि मन अगदी शांत होत.
       ३.  पौष्टिक नाश्ता. व्यायामानंतर अगदी सपाटून भूक लागते. तसे मराठी सगळेच  पौष्टिक आहेत. अगदी ते इंग्लिश ओट्स वैगरे खायची गरज नाही.

ह्या सवयी मी लावून घेतल्या ह्या वेळात. पण एक गोष्ट मात्र खरी काम मात्र घरी राहून कारण खूपच कठीण आहे. आणि त्यामुळे बरीच लोकांना बरेच मानसिक त्रास होतायत. तुम्ही तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. आणि हा  लेखं आवडला असेल तर कृपया LIKE करा. तुमचा प्रतिसादाने मला प्रेरणा मिळते. तुमचे विचार नक्की सांगा कंमेंट्स मधून. मला ऐकायला नक्कीच आवडेल..

Saturday, June 20, 2020

मुसफ़िर - अच्युत गोडबोले


             हि अच्युत गोडबोले यांची आत्मकथा आहे. मुळचे सोलापुरचे, नंतर शिक्षणासाठी मुंबईला आले आणि मग मुंबईलाच स्थायिक झाले. नंतर नोकरी , परदेश प्रवास, वैयक्तिक आयुष्य , लिखाण अशा त्यांच्या या प्रवासाची हि कहाणी आहे.
            गोडबोलेंच बालपण अगदी समृद्ध गेलं. त्यांचे मित्रमंडळी, शिक्षक, शाळा , छंद , संगीत , सिनेमे या सगळ्याचे अनुभव अगदी रसभरीत आहेत . वाचताना अगदी मजा येते. १२वीला JEE परीक्षेत उत्तम मार्कांनी उत्तीर्ण झाले आणि IIT Bombay ला Chemical Engineering ला प्रवेश घेतला. त्यानंतर रॅगींग , वाचन ,संगीत , इंग्रजीबद्दलचा न्यूनगंड, कॉलेजमधील मजा-मस्ती हा सगळा रोमांचकारक प्रवास अगदी हुबेहूब डोळ्यांसमोर उभा करतात. मला IIT चे अनुभव ऐकताना सगळ्यात जास्त मजा आली.
            त्यानंतर समाजसेवा करायची म्हणून त्यांनी कॅम्पस प्लेसमेंट मधून लागलेली नोकरी न स्विकारता गोडबोलेंनी स्वतःला आदिवासींच्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिले. तिथे जवळपास एक वर्ष काम केल. तेथील अनुभव, आदिवासींच्या व्यथा , त्यांच्यावर होणारे अन्याय , त्यांचा इतिहास , राजकीय घडामोडी याबद्दल बरीच नवीन माहिती मिळते. अशाच एका कार्यक्रमात सहभागी झाले म्हणून पोलीस त्यांना आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना अटक करतात आणि त्यांना दहा दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा होते. या दहा दिवसांमध्ये त्यांना बऱ्याच प्रकारचे लोक भेटतात वेगवेगळ्या विचाऱ्यांच्या, वेगवेगळ्या मनोवृत्तीच्या. कैद्यांचे आयुष्य, त्यांचे अनुभव याबद्दल बरच काही वाचायला मिळत.
             त्यानंतर काहीच दिवसांमध्ये त्यांना अस जाणवायला लागत कि आपण हे काम आयुष्यभर नाही करू शकणार. हि जाणीव होताच ते मुंबईला येतात. याच काळात बेकार असताना ते वेगवेगळ्या चाळींतील लोकांना भेटतात त्यांच्याशी सवांद साधतात. या सगळ्या लोकांचा वेगवेगळ्या कथाहि या पुस्तकात वर्णिलेल्या आहेत. वेश्या, त्यांचे जीवन, त्यांच्या व्यथा , त्यांच्या कथा याबद्दल बरच काही. याच काळात ते प्रेमातहि पडतात 'शोभा' नावाच्या मुलीशी. तेव्हा ती जे जे स्कूल ऑफ आर्टस् मध्ये शिक्षण घेत असते. लेखकाला 'टाटा मिल' मध्ये नोकरी मिळते प्रोग्रामर म्हणून आणि अशाप्रकारे त्यांचं इन्फोटेक मधल करिअर सुरु होत. मग शोभा आणि गोडबोले रजिस्टर पद्धतीने लग्न करतात. आणि इन्फोटेक क्षेत्रातच ते ३७ वर्ष नोकरी करतात.
               इन्फोटेक मधेच काम करत असताना त्यांच्या आयुष्यात अजून एक मोठा प्रसंग घडतो आणि पूर्ण कुटुंब हादरून जात तो म्हणजे त्यांच्या मुलाला ऑटिसम असल्याचं त्यांना कळत. मग त्याच्या भविष्यासाठी जमवाजमव करणं, त्याच्यासाठी शाळा शोधण, विविध उपचार त्याला देणं, या  सर्व गोष्टीवर लेखक भाष्य करतात.
                आणि शेवटी त्यांच्या लेखनाच्या प्रवासाविषयी सांगतात. त्यांच्या किमयागार, नादवेध , अर्थात यासारख्या अनेक पुस्तकांविषयी ते भरभरून बोलतात आणि या पुस्तंकामुळे लोकांच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला याबद्दलही बोलतात.
              हि तर ओव्हरऑल एक ओउटलाइन आहे पण खरी मजा तर यासर्व टप्प्यातील त्यांचे अनुभव ऐकण्यामधे आहे. मी ह्या पुस्तकाला ५/५ रेटिंग देईल . प्रत्येक टप्प्याटप्प्याला गोष्ट अगदी रंगत च जाते. लेखनशैली भन्नाट आहे. अगदी खिळवून ठेवणार पुस्तक आहे. तुम्ही  हे पुस्तक नक्कीच वाचाल अशी आशा आहे . मला तुमची मत ऐकायला नक्कीच आवडेल. मला नक्की कळवा.

Sunday, March 15, 2020

बाबा भाग - १

                                                         बाबा
         किती गोड शब्द आहे ना!. पण तुम्हाला माहितेय का आज जेवढी या शब्दाची किंमत कळतेय ना तेवढी ती या आधी कळली नव्हती.  मित्रांनो याच कारण पण तसाच आहे. काही दिवसांपुर्वी मी माझ्या वडिलांना गमावलं. ८ फेब्रुवारी २०२० साली त्यांचं निधन झालं.  ते फेसबुकवर पोस्ट येतात ना कि प्रत्येक यशस्वी मुलीचा मागे एक खूप विश्वास टाकणारा बाप असतो माझे पप्पा अगदी तसेच होते. मी आज IIT मध्ये M.Tech करतेय. ते नेहमी म्हणायचे कि मला फक्त तुझाकडून अपेक्षा आहे. माझं नाव तुच मोठं करशील असं मला वाटतं. आणि त्यांचा डोळ्यात तो आनंद दिसावा म्हणून मी पण खुप मेहनत घेतली.
          मी दहावीच्या परीक्षेत शाळेत पहिली आली तेव्हा त्यांना झालेला आनंद. मला IIT ला दाखला मिळाला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा तो आनंद, त्यांना माझाबद्दलचा असलेला अभिमान त्यांचा प्रत्येक कृतीतून दिसत होता. काही दिवसांपूर्वी ते मला सोडायला आले होते IIT ला , खुप खुश होते. मला आज खूप बरं वाटतं कि जायच्या आधी मी त्यांची हि इच्छा पूर्ण करू शकली. आता माझं पुढचं यश ते पाहत असतील नसतील माहित नाही. पण जिवंतपणी मी त्यांना हा आनंद देऊ शकले ह्याच समाधान आहे.
          पण एक खंत पण आहे हे सगळं मिळवत असताना मला लवकर घरापासून लांब राहायला लागलं. मी अकरावी पासूनच हॉस्टेलवर राहते. त्यामुळे ह्या सगळ्यात त्यांचा सहवास कमी मिळाला. आता ते निवृत्त झाले होते घरी गेली कि आवडीने माशाची आमटी न भाजलेले मासे करायचे माझ्यासाठी म्हणून. न मग आम्ही दोघंच मिळून पूर्ण ताव मारायचो. तुमचा सहवासाचा लोभ होता पण नियतीचा डाव काही वेगळा होता असच म्हणायला हवं आता. सगळं खूप आठवेल पण तुमचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे.
           मला माफी मागायची आहे पप्पा तुमची कि तुम्ही रोज ओरडून पण मी तुम्हाला रोज कॉल नाही करू शकले. हि गोष्ट कायम खात राहील मला. आज मला तुमचा आवाज ऐकावासा वाटतो पण आता तो कधीच नाही ऐकता येणार. मला नेहमी तुमच्या सारखं बनायचं होत. तुमच्या आनंदातच मला सुख वाटायचं.
          मला माहित नाही हा मेसेज मी किती लोकांपर्यंत पोहोचू शकेल पण जे लोक वाचतील त्यांना मला सांगायच आहे कि प्लीज जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत त्यांची काळजी घ्या त्यांना खुश ठेवा. गमावल्या नंतर दुःख करून घेण्यात काहीच अर्थ नसतो आणि त्यांना आपल्याकडून अजून काहीच नको असत फक्त एक ५ मिनटं त्यांच्याशी प्रेमाने बोललं कि ते खुश होतात. प्लीज त्यांना वेळ द्या.
           आज खूप दिवसांनी मनातलं सगळं बोलून खूप बरं वाटलं तुम्ही ते वाचलंत न समजून घ्याल हि आशा.