Thursday, September 17, 2015

कोकण..... काल आणि आज

 कोकण..... काल आणि आज

आजुबाजुला पसरलेले हिरवे डोंगर, ऐसपैस पसरलेल्या ठेंगण्याठुसक्या टेकड्या, नारळी-पोफळीच्या डोलणा-या रांगा, काजू आंब्याच्या फऴभारांनी बहरलेल्या बागा, उतरत्या छपराची कौलारू घरे, शेणाने सारवलेली, रांगोळ्यांनी भरलेली अंगणे, साधीभोऴी प्रेमळ माणसे. पांढऱ्याशुभ्र मऊशार वाळूचे लांबलचक किनारे, लाटांवर तरंगणाऱ्या शिडाच्या नावा.
        थोडक्यात सांगायचे तर,
           लाल लाल हि माती, इथले डोंगर हिरवे हिरवे.
           डोईवरती आकाशाने रंग पसरले बरवे.
           मासोळ्याचे सूर पाहण्या डोहामधून ज़ाऊया,
           चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊया.
असे हे कोकण. काश्मीर, केरळशी स्पर्धा करणारे माझे निसर्गरम्य कोकण.
        कोकण म्हटले की आपणाला आठवतो तो हिरवागार निसर्ग. सर्वाना भुरळ पाडणारा निसर्ग. गर्द वनराईना धुक्याच्या पांघरुणात लपेटून पहुडलेली आंबोली. तेथे कड्यातून पावसाळ्यात कोसळणा-या जलबिंदूंच्या माळा. आंबोलीसारख्या अनेक प्रेक्षणीय स्थळांनी नटलेले हे कोकण. गणपतीपुळे, हिरण्यकेशी सारखी तीर्थक्षेत्रे. मालवण, देवगड, वेंगुर्ला यासारखे समुद्र किनारे, सिंधुदुर्ग-विजयदुर्ग सारखे जलदुर्ग. रायगड, यशवंत, मनोहर गडासारखे किल्ले. पर्यटकांची गर्दी खेचणारी हि स्थळे. माझ्या कोकणचे हे खरेखुरे वैभव.
        कोकणातील लोककला हा तर स्वतंत्र अभ्यासाचा विषय. कोकणातील जत्रांमधून रात्रीपासून पहाटेपर्यंत चालणारी दशावतारी नाटके हि तर कोकणची खास ओळख. उस्फुर्त संवाद, भरजरी वेशभूषा, लयबद्ध युद्धदृश्ये, हार्मोनियम-पखवाजाच्या पार्श्वभूमीवर मोकळ्या मैदानात सादर होणारे दशावतारी नाटक आणि ते आतुरतेने पाहणारी कोकणी माणसे, हे कोकणात दिसणारे नेहमीचे दृश्य. कठपुतळ्या, मंगळागौरी, गणेशचतुर्थीसारख्या सणांना रंगणा-या फुगड्या, वाड्यापाड्यावर मंदिरातून रंगणारी भजने, पहाटेच्या प्रहरी दारावर येणारा पिंगळी. कोकणातील ह्या लोककलांनी कोकणात जे चैतन्य निर्माण केले आहे ते चैतन्य टिकवणे आज आपल्यापुढे मोठे आव्हान आहे. कारण कोकणच्या शहरीकरणात आता ह्या लोककला एक तर नष्ट तरी होत आहेत किंवा आपले मुळरूप तरी बदलत आहेत. कठपुतळ्या आता फक्त प्रदर्शनीय झाल्या आहेत. दशावतारहि आता अधिक नाटकी आणि कृत्रिम होत चालले आहे. कोकणातील या लोककला आपल्याला जपायला हव्यात.
        कोकण रेल्वेने कोकणाचे सारे रूपच पालटून टाकले. घुंगुरमाळांचा मंजुळ आवाज करीत पहाटे पहाटे माल आणायला जाणा-या बैलगाड्या आता इतिहास जमा झाल्या आहेत. तरीसुद्धा डोंगरद-यांमधून वळणे घेत जाणारी कोकणकन्या आपल्या डोळ्यांचे पारणे फेडते. अरुंद सडकांची जागा आता चौपदरी रस्त्यांनी घेतली आहे. या रस्त्याने आता वाहनांची गर्दी आपणाला दिसते. शाळा कॉलेजच्य विद्यार्थ्यांपासून ते शेतात काम करणाऱ्या मजूरापर्यंत सगळ्यांच्या हातात मोबाईल दिसू लागले आहेत. ज्या कोकणी संस्कृतीचे आपण गोडवे गात असतो त्या संस्कृतीवरहि दूरदर्शनने आक्रमण केले आहे.
        ज्या कोकणात वि. सं. खांडेकर, श्री. ना. पेंडसे, करंदीकर, पाडगावकर, जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक यांच्यासारखे साहित्यिक जन्माला आले त्या कोकणात वाचनसंस्कृती टिकवण्यासाठीच नव्हे तर रुजवण्यासाठी प्रयत्न करायची आवश्यकता निर्माण झाली आहे.
        लोकमान्य टिळक, साने गुरुजी, मधु दंडवते, अप्पासाहेब पटवर्धन, बॅ. नाथ पै यांसारख्या थोर पुरुषांच्या या कोकणभूमीत त्यांच्याच विचारांची परवड होताना आज आपल्याला दिसत आहे. कोकणभूमीत रुजू पाहणारे हे राजकारण कोकणला कुठे घेऊन चालले आहे हे कळत नाही. कोकण विकसाच्या नावाखाली कोकणची हिरवाई तर नष्ट होणार नाही ना ? येऊ घातलेले औष्णिक ऊर्जा प्रकल्प आपल्या नारळ-पोफळी, काजू, आंब्याच्या राया तर नष्ट करणार नाहीत ना? या प्रश्नांनी कोकणी माणूस आज संभ्रमित आहे. ह्या सा-याविरुद्ध लढा देण्यासाठी तो सज्ज झाला आहे. त्याला आपल्या निसर्ग देवतेचा बळी देऊन हा विकास नको आहे. त्याला उद्योगधंदे हवे आहेत पण आपले पर्यावरण संभाळून. फळांवर प्रक्रिया करणारे, मत्स्यउत्पादनातून निर्माण होणारे प्रकल्प त्याला हवे आहेत. पर्यटनावर आधारीत प्रदूषण विरहित उद्योग करण्यासाठी तो तयार होत आहे. यापूर्वी,"येवा, कोकण तुमचा आसा !" अस म्हणणारा कोकणी माणूस आता, "जावा, कोकण आमचा आसा !" असं खडसावून प्रदूषित उद्योगाविरूद्ध उभा राहतो आहे. आज कोणतेही स्थानिक वृत्तपत्र उघडले की यासंबंधीच्या बातम्या वाचायला मिळतात.
       डोंगरद-या, वृक्षराजी, समुद्रकिनारे, खळखळणा-या नद्या, मधुर फळांनी बहरलेल्या बागा, तुडुंब भरलेल्या विहीरी, ओथंबुन धावणारे आभाळातील काळे ढग, चमचमणा-या विजा, चंदेरी चांदण्यांची रात्र असा स्वर्गीय आनंद देणारे आमचे कालचें कोकण आजही आम्हाला हवे आहे. हे सर्व संभाळून भविष्यातील बदलणारे कोकण स्विकारायला आम्ही तयार आहोत.

Thursday, September 10, 2015

दिल दोस्ती दुनियादारी


   दिल दोस्ती दुनियादारी 
 
      दिल दोस्ती दुनियादारी......zee marathi वर लागणारी एक मालिका. मैत्री असावी तर या सहा जणांसारखी. खर तर आपली भारतीय संस्कृती अशाप्रकारे मुलामुलींचं एकत्र राहणं याला मान्यता देत नाही. पण तरीही फक्त निखळ मैत्रीवर चालणारी हि मालिका अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळे आवडीने बघतात. तस खुप मोठ अस काहीच घडत नाही या मालिकेत, म्हणजे इतर मालिकांमधे जसे वाद होतात, एकमेकांचे हेवेदावे केले जातात, खुन,मारामा-या केल्या जातात तस काहीच होत नाही. अगदी साधे साधे आपल्या रोजच्या आयुष्यातील विषय सहज लोकांसमोर मांडले जातात. तिथे दिसते ती निखळ मैत्री  आणि मित्रांमधील प्रेम. 
        कधी हे मित्र  किशोर कुमारांचा वाढदिवस साजरा करतात, तर कधी मैत्रीची भेळ बनवतात तर कधी एकमेकांना कुटुंबियांसारख प्रेम देतात आणि मित्र म्हटलं की मस्ती येणारच.
        असे मित्र असणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. मैत्री सारख दुसर नातं नाही. कसलीच अपेक्षा नाही, कसला भेदभाव नाही. 
        आमचे कणकवलीतले दिवस पण असेच होते. भन्नाट, मजा मस्तीने भरलेले. आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही फक्त कॉलेजचे  मूल-मुली रहायचो. त्यामुळे हि मालिका बघताना त्याच दिवसांची आठवण होते. रात्री 12 वाजता वाढदिवस साजरा करण, केक खाण्यापेक्षा जास्त तोंडाला फासणं, परीक्षा आली की रात्रंदिवस एकत्र अभ्यास करणं, पेपर झाला की त्या रात्री एकत्र मस्त एक हॉरर cinema बघणं, वर्ल्ड कपचा सामना म्हणजे तर काय धिंगणा घालायला एक निमित्तच. मोठ्याने गाणी लावणे, कधी कधी तर बाटल्या, डबे वाजवून स्वतःचचं मनोरंजन करायचो. मेसच्या जेवणाचा कंटाळा आला की सगळ्यांसाठी maggy चा बेत. Maggy बंद झाली खरी पण हे कळायच्या आधी आम्ही किती किलो maggy पचवली आणि किती लिड शरीरात गेल असेल याच मोजमापच करता येणार नाही. 
        पण खरच, आयुष्यात कधीतरी असा मित्रांसोबत वेळ घालवावा, मजामस्ती करावी. या  सगळ्यात घरच्यांची आठवण सतवते खरी पण मैत्रीतलं हे सुख एक वेगळाच अनुभव देऊन जात.

Sunday, September 6, 2015

मैत्री

मैत्री 

मैत्रीचे  धागे कधीच नसतात तुटणारे 
जुन्या आठवणी आठवून गालात हसणारे 
कधी कधी क्षणात रडवणारे 
मैत्री म्हणजे अतूट विश्वास 
आयुष्यातल्या प्रेमाचा प्रवास 

मैत्रीत असतो हक्क 
त्यात असत प्रेमाच बंधन पक्क 

मैत्रीत मिळतो संद्याकालचा गार वारा 
ज्यामध्ये बरसतात नेहमीच मस्तीच्या गारा 

मनात असतो आठवणींचा खेळ 
असाच कधीतरी जमतो मग मैत्रीचा मेळ 

मैत्रीचे धागे कधीच नसतात तुटणारे 
जुन्या आठवणी आठवून गालात हसणारे
 

Wednesday, September 2, 2015

















At Vengurla Beach........

परिक्षा

परीक्षा 

परीक्षा म्हणजे कंटाळा 
परीक्षा म्हणजे अभ्यास 
परीक्षा म्हणजे आहे ते नको असताना 
ताटात जबरदस्ती वाढलेली कारल्याची भाजी खास. 


परीक्षा म्हणजे जागरण 
परीक्षा म्हणजे अडथळा 
परीक्षा म्हणजे जमत नसताना 
बुद्धीचा केलेला खुळखुळा. 


परीक्षा म्हणजे tension 
परीक्षा म्हणजे study चे section 
परीक्षा म्हणजे कुठलं तरी 
भुलभुलैय्या वाल mansion . 

परीक्षा म्हणजे जबरदस्ती 
परीक्षा म्हणजे दबावाखालील मस्ती 
परीक्षा म्हणजे exam hall मध्ये 
काही येत नसताना आलेली सुस्ती. 

परीक्षा म्हणजे यश किंवा अपयश 
परीक्षा म्हणजे वीस किंवा पंचाहत्तर 
परीक्षा म्हणजे answers येत नसताना 
पेपर मध्ये ठोकलेल उत्तर. 

अशीच उत्तर लिहून education पूर्ण होत 
पण आयुष्यातील परीक्षा मात्र संपत नाही.