Saturday, June 20, 2020

मुसफ़िर - अच्युत गोडबोले


             हि अच्युत गोडबोले यांची आत्मकथा आहे. मुळचे सोलापुरचे, नंतर शिक्षणासाठी मुंबईला आले आणि मग मुंबईलाच स्थायिक झाले. नंतर नोकरी , परदेश प्रवास, वैयक्तिक आयुष्य , लिखाण अशा त्यांच्या या प्रवासाची हि कहाणी आहे.
            गोडबोलेंच बालपण अगदी समृद्ध गेलं. त्यांचे मित्रमंडळी, शिक्षक, शाळा , छंद , संगीत , सिनेमे या सगळ्याचे अनुभव अगदी रसभरीत आहेत . वाचताना अगदी मजा येते. १२वीला JEE परीक्षेत उत्तम मार्कांनी उत्तीर्ण झाले आणि IIT Bombay ला Chemical Engineering ला प्रवेश घेतला. त्यानंतर रॅगींग , वाचन ,संगीत , इंग्रजीबद्दलचा न्यूनगंड, कॉलेजमधील मजा-मस्ती हा सगळा रोमांचकारक प्रवास अगदी हुबेहूब डोळ्यांसमोर उभा करतात. मला IIT चे अनुभव ऐकताना सगळ्यात जास्त मजा आली.
            त्यानंतर समाजसेवा करायची म्हणून त्यांनी कॅम्पस प्लेसमेंट मधून लागलेली नोकरी न स्विकारता गोडबोलेंनी स्वतःला आदिवासींच्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिले. तिथे जवळपास एक वर्ष काम केल. तेथील अनुभव, आदिवासींच्या व्यथा , त्यांच्यावर होणारे अन्याय , त्यांचा इतिहास , राजकीय घडामोडी याबद्दल बरीच नवीन माहिती मिळते. अशाच एका कार्यक्रमात सहभागी झाले म्हणून पोलीस त्यांना आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना अटक करतात आणि त्यांना दहा दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा होते. या दहा दिवसांमध्ये त्यांना बऱ्याच प्रकारचे लोक भेटतात वेगवेगळ्या विचाऱ्यांच्या, वेगवेगळ्या मनोवृत्तीच्या. कैद्यांचे आयुष्य, त्यांचे अनुभव याबद्दल बरच काही वाचायला मिळत.
             त्यानंतर काहीच दिवसांमध्ये त्यांना अस जाणवायला लागत कि आपण हे काम आयुष्यभर नाही करू शकणार. हि जाणीव होताच ते मुंबईला येतात. याच काळात बेकार असताना ते वेगवेगळ्या चाळींतील लोकांना भेटतात त्यांच्याशी सवांद साधतात. या सगळ्या लोकांचा वेगवेगळ्या कथाहि या पुस्तकात वर्णिलेल्या आहेत. वेश्या, त्यांचे जीवन, त्यांच्या व्यथा , त्यांच्या कथा याबद्दल बरच काही. याच काळात ते प्रेमातहि पडतात 'शोभा' नावाच्या मुलीशी. तेव्हा ती जे जे स्कूल ऑफ आर्टस् मध्ये शिक्षण घेत असते. लेखकाला 'टाटा मिल' मध्ये नोकरी मिळते प्रोग्रामर म्हणून आणि अशाप्रकारे त्यांचं इन्फोटेक मधल करिअर सुरु होत. मग शोभा आणि गोडबोले रजिस्टर पद्धतीने लग्न करतात. आणि इन्फोटेक क्षेत्रातच ते ३७ वर्ष नोकरी करतात.
               इन्फोटेक मधेच काम करत असताना त्यांच्या आयुष्यात अजून एक मोठा प्रसंग घडतो आणि पूर्ण कुटुंब हादरून जात तो म्हणजे त्यांच्या मुलाला ऑटिसम असल्याचं त्यांना कळत. मग त्याच्या भविष्यासाठी जमवाजमव करणं, त्याच्यासाठी शाळा शोधण, विविध उपचार त्याला देणं, या  सर्व गोष्टीवर लेखक भाष्य करतात.
                आणि शेवटी त्यांच्या लेखनाच्या प्रवासाविषयी सांगतात. त्यांच्या किमयागार, नादवेध , अर्थात यासारख्या अनेक पुस्तकांविषयी ते भरभरून बोलतात आणि या पुस्तंकामुळे लोकांच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला याबद्दलही बोलतात.
              हि तर ओव्हरऑल एक ओउटलाइन आहे पण खरी मजा तर यासर्व टप्प्यातील त्यांचे अनुभव ऐकण्यामधे आहे. मी ह्या पुस्तकाला ५/५ रेटिंग देईल . प्रत्येक टप्प्याटप्प्याला गोष्ट अगदी रंगत च जाते. लेखनशैली भन्नाट आहे. अगदी खिळवून ठेवणार पुस्तक आहे. तुम्ही  हे पुस्तक नक्कीच वाचाल अशी आशा आहे . मला तुमची मत ऐकायला नक्कीच आवडेल. मला नक्की कळवा.

No comments:

Post a Comment